Thursday 19 December 2013

bhakti
नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्‍या वगैरे पुष्कळ होत्या. त्यामुळे नंदगावचे महत्त्व. शिवाय तेथे एक मोठा तुरुंग होता.  लांबलांबचे कैदी नंदगावच्या तुरुंगात आणून ठेवण्यात येत.

तुरुंग म्हणजे पृथ्वीवरचा नरक. आज तुरुंग थोडे तरी सुधारलेले आहेत; परंतु त्या काळी तुरुंगांत अपरंपार हाल असत. कैद्यांना पशूंहूनही वाईट रीतीने वागवण्यात येई. जरा काही झाले की शिक्षा व्हायच्या. हातापायांत जड साखळदंड पडायचे. फटके केव्हा बसतील त्याचा नेम नसे.

तुरुंगातून मोठी शिक्षा झालेला कैदी जिवंतपणे बाहेर पडणे जवळजवळ अशक्य असे. तुरुंगातील हालअपेष्टा बाहेरच्या जगात सांगण्यासाठी तो कधी येत नसे. निराशेने  त्याचे आयुष्य कमी होई व तो तुरुंगातच मरे. तुरुंगातील जीवन म्हणजे भयाण जीवन. कैदी रडला नाही असा एक दिवस जात नसे. सुस्कारे व अश्रू यांचेच वातावरण तुरुंगात असे.

एके दिवशी सायंकाळच्या वेळी नंदगावात एक मनुष्य हिंडत होता. तो उंच होता. हाडपेर मजबूत होते; परंतु तोंडावर चिंता होती. त्याच्याजवळ काही नव्हते. अंगावर फाटके कपडे होते. तो रात्रीपुरती निवार्‍याची जागा बघत होता. तो एका हॉटेलात शिरला. त्याने थोडे खायला मागितले. तेथील एका जागेवर तो बसला.

No comments:

Post a Comment